India
पुणे: बस तिकीट दरवाढीमुळं कामगार, विद्यार्थ्यांवर आर्थिक तणाव
पीएमपीएमएल बसच्या तिकीट दरात जवळपास दुपटीनं वाढ करण्यात आली आहे.

१ जून २०२५ पासून पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसच्या तिकीट दरात जवळपास दुपटीनं वाढ करण्यात आली आहे. यामुळे शहरातील रोजच्या प्रवासासाठी बसवर अवलंबून असलेल्या कामगार आणि विद्यार्थी वर्गावर आर्थिक ताण वाढला आहे. महामंडळ आर्थिक तोट्यात जात असल्यामुळे अकरा वर्षांनंतर केलेली ही दरवाढ आवश्यक असल्याचं पीएमपीएमएल प्रशासनानं म्हटलं असलं, तरी सर्वसामान्य प्रवाशांमधून दरवाढी संबधी तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
नवीन दरवाढीनुसार १ ते ५ किमी अंतरासाठी आता १० रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर पुणे महानगरपालिका हद्दीसाठी असणारा ४० रुपयांचा दैनिक पास व पिंपरी चिंचवड हद्दीसाठी असणारा ५० रुपयांचा दैनिक पास रद्द करून दोन्ही महापालिकांसाठी एकत्रितपणे नवीन दरांनुसार एकच ७० रुपयांचा पास करण्यात आला आहे. सोबतच मासिक पास ९०० ऐवजी १५०० रुपये केला गेला आहे. हा पास कामगार वर्ग विशेषतः वापरात असल्यानं अचानकपणे दरमहा ६०० रुपयांची ही दरवाढ त्यांच्यासमोर नवीन आव्हानं उभी करत असल्याचं कामगार सांगतात.
इंदिरा नगरचे रहिवासी पन्नाशीतले सोनकांबळे गेल्या १० वर्षांपासून पुण्यात हमालीचं काम करतात. “मला कामासाठी दररोज इंदिरा नगरवरून कधी गुलटेकडीपर्यंत तर कधी नाना पेठ, मार्केट यार्ड असा प्रवास करावा लागतो. आतापर्यंत मला या अंतरासाठी दररोज एका बाजूनं १० ते १५ रुपये लागत होते. परंतु दरवाढ केल्यापासून आता एकदमच ४० रुपये खर्च होत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रवासाचा खर्च वाढल्यानं केल्याने घर खर्चाच्या संबधित अनेक तडजोडी कराव्या लागत आहेत. एवढा प्रवास खर्च आमच्यासारख्या हमाली काम करणाऱ्या सामान्य नागरिकांना कसा परवडेल?” ते विचारतात.
सोनकांबळे पुढं म्हणाले, “माझी दररोजची कमाई जेमतेम ५०० ते ६०० रुपये असते त्यातुन १०० रुपये जर फक्त प्रवास खर्चात जात असतील तर घर खर्च व जीवनावश्यक खर्च भागवण्यासाठी आम्हाला बस वापरणं सोडावं लागेल.”
रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांसाठी छोटी दरवाढदेखील अडचणीची ठरू शकते. त्यात मासिक पासच्या दारात झालेली मोठी दरवाढ महिन्याचं आर्थिक गणित बिघडवणारी असल्याचं नारायण पेठेत घरकाम करणाऱ्या जयश्री बने सांगतात.
"मी घरकाम करण्यासाठी रोज धायरीवरून नारायण पेठ, लक्ष्मी रोड भागात येते, त्यासाठी मी बसचा मासिक पास काढला आहे. अगोदर हा ९०० रुपये होता, मात्र आता त्याचा दर एकदम १५०० रुपये करून आम्हाला अडचणीत आणलं आहे. अचानक ६०० रुपयांनी दरवाढ झाल्यामुळं आमच्यासारख्या घरकाम करणाऱ्यांची मोठी आर्थिक कोंडी झाली आहे. माझी महिन्याची कमाई ८ हजार रुपये आहे. त्यातून १५०० रुपये जर फक्त प्रवास खर्च जात असेल, तर मग बाकीचा खर्च कसा भागवायचा? आमच्या घराजवळ बस येण्याचं प्रमाणदेखील अत्यंत कमी आहे. एकीकडे तिकीटांच्या किमतीमध्ये एवढी मोठी वाढ करतात आणि दुसरीकडे नीट सुविधाही देत नाहीत," बने म्हणतात.
दरवाढीमुळे कामगारांची आर्थिक कोंडी
परिसर या संस्थेनं पीएमपीएमएल संबंधी नुकत्याच केलेल्या एका संशोधनानुसार पीएमपीएमएल ही संपूर्ण पुणे महानगर क्षेत्रातील जवळपास ७० लाख लोकसंख्येपर्यंत पोहोचणारी परिवहन सेवा आहे. बऱ्याच लोकांसाठी, विशेषत: कामगार आणि विद्यार्थी वर्गासाठी, ही एकमात्र उपलब्ध सार्वजनिक वाहतूक सेवा आहे.
त्यांच्या अहवालानुसार गेल्या काही वर्षांपासून पीएमपीएमएलच्या प्रवाशांची संख्या सातत्यानं कमी होत आहे. कमी अंतरासाठी भाडेवाढ केल्यास, प्रवाशांसाठी बसचा रूपये प्रति किमीचा खर्च दुचाकीपेक्षा जास्त होईल. सद्यस्थितीत दुचाकीचा दर २ रू प्रति किमी आहे. त्यामुळे आणखी मध्यमवर्गीय दुचाकीकडे वळण्याची शक्यता आहे. यानं वाहतूक कोंडीत अधिक भर पडेल.
“माझ्या ओळखीतील चार कामगारांनी पीएमपीनं प्रवास करणं सोडून दिलं आहे. बस दरवाढीमुळं त्यांच्या रोजच्या खर्चात ३० रुपयांनी वाढ झाली आहे. त्यामुळे आता त्या चारही कामगारांनी दुचाकींचा वापर करण्यास सुरुवात केली आहे," परिसर संस्थेच्या श्वेता वेर्णेकर यांनी इंडी जर्नलशी बोलताना सांगितलं.
नाव न सांगण्याच्या अटीवरुन घरकाम करणाऱ्या एक महिला कामगार म्हणाल्या “मी कामासाठी रोज दांडेकर पूल ते डेक्कन असा प्रवास करते. अगोदर मला ५ रुपये तिकीट असल्यानं मी बसनं, कमी वेळेत कामावर जाऊन येऊ शकत होते. मात्र माझं तिकीट १० रुपये झालं आहे. त्यामुळे बसनं जाण्याऐवजी मी पायी जाण्याचा विचार करते. एवढ्या कमी अंतरासाठी १० रुपये देणं आम्हाला परवडणारं नाही. अगदी ५ रुपयांनी सुद्धा आमच्या घर खर्चावर परिणाम होतो.”
अशोक नागरगोजे हा बीडवरून पुण्यात सायबर सेक्युरिटी चा कोर्स करण्यासाठी आला आहे. तो म्हणतो “मी पुण्यात सायबर सेक्युरिटीचा कोर्स करत आहे. माझे वडील शेतकरी आहेत. आमचा उदरनिर्वाह संपूर्णपणे शेती वरती अवलंबून असतो. मला पुण्यात लागणारा सर्व खर्च घरूनच घ्यावा लागतो. दत्तवाडीवरून डेक्कन पर्यंत येण्या-जाण्यासाठी मला आधी १० रुपये लागत होते. पण आता ४ पट जास्त म्हणजे २० रुपये यायला आणि २० रुपये जायला, असे रोज ४० रुपये रोज द्यावे लागत आहेत. त्यामुळे मला दत्तवाडी ते डेक्कन पर्यंत पायी प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही, कारण शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे महिन्याला एवढा खर्च करणे आम्हाला परवडत नाही.”
पीएमपीएमएलच्या आर्थिक तोट्यामुळे प्रवाशांचे खिसे रिकामे
गेली ११ वर्षं बस तिकिटांची दरवाढ केली नसल्याचं म्हणत पीएमपीएमएलच्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ म्हणाल्या, “सिएनजीवर चालणाऱ्या बसेसच्या इंधनाचा खर्च पूर्वी ४४ रुपये होता, जो आता ८९ रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्याचप्रमाणे आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार, सातवा वेतन आयोग आणि इतर प्रशासकीय खर्चही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.”
त्या पुढं म्हणाल्या, “सध्या पीएमपीएमएलचा महसूल केवळ ५० टक्के इतकाच आहे. त्यामुळे वाढत चाललेल्या खर्चाला सामोरं जाण्यासाठी आणि तोटा काही प्रमाणात कमी करण्यासाठी तिकीट दरवाढ करणं आवश्यक होतं.”
“मलाही ही दरवाढ करावी असे वाटत नाही, पण ही गरज आहे. अन्यथा पीएमपीएमएलसारखी संस्था चालवणे कठीण होईल,” असंही मुधोळ बोलताना म्हणाल्या.
आर्थिक तोट्याची भरपाई कोणाकडून?
पीएमपी प्रवासी मंच चे सचिव संजय शितोळे यांनी या दरवाढीला तीव्र विरोध केला ते म्हणाले “साधारणतः पीएमपीएमएलच्या वापरकर्त्यांमद्धे कामगार आणि विद्यार्थी यांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. यामध्ये सेक्युर्टी गार्ड, आया, घरकाम करणाऱ्या स्त्रिया तसेच इतर कोर्सेस करणारे आणि स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी आहेत. यांच्या दृष्टीने ही भाडेवाढ त्यांच्या आर्थिक नियोजनपेक्षा खूप मोठी आहे. एका बाईला ८ ते १० हजार पगार मिळत असेल तर तिला अचानक पास मध्ये ६०० रुपायांची वाढ ही मोठी आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसत आहे.”
पुण्यात राहून स्पर्धा परीक्षांची तयारी करणारा तेजस काळे सांगतो, “मी ६ महिन्यांपूर्वी पुण्यात आलो. आई-वडील शेती करून मला महिन्याच्या खर्चासाठी पैसे पाठवतात. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे जेमतेम पुरतील एवढेच पैसे घरून येतात. मी दत्तवाडीमध्ये राहतो. मला क्लासेससाठी दररोज सदाशिव पेठेत जावं लागतं. त्यासाठी आधी मला केवळ ५ रुपये लागत होते. मात्र आता थेट २० रुपये तिकीट झाल्यामुळे माझा दरमहा प्रवास खर्च ३०० वरून १२०० वरती गेला आहे. या मोठ्या फरकामुळे मला आर्थिक अडचणी येत आहेत”
शितोळे पुढं म्हणतात, “पीएमपीएमएलला उत्पन्न वाढवण्याची अनेक साधनं उपलब्ध आहेत, त्यामध्ये त्यांच्या जागा भाड्यानं देणं, जाहिरातीमधून उत्पन्न मिळवणं, असे अनेक पर्याय ते निवडू शकतात. उत्पन्नाची साधनं वाढवली तर दरवाढ करण्याची वेळ येणारच नाही.”
परिसरनं देखील त्यांच्या अहवालात महसूल वाढवणं, तोटा कमी करणं व भ्रष्टाचाराला आळा घालणं, या मार्गांनी पीएमपीएमएलची बससेवा आणि आर्थिक कार्यक्षमता कशा प्रकारे सुधारता येईल, याचं एक स्वतंत्र परीक्षण करून बससेवा वापरकर्त्यांना अधिक सोयीस्कर करून द्यावी, असं सुचवलं आहे. "त्याचबरोबर सध्या पीएमपीएमएलच्या तोट्याचा भार केवळ पुणेमहानगर पालिका आणि आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिका उचलत आहे. पण या दोन महापालिका क्षेत्रांच्या बाहेरदेखील पीएमपीएमएलची परिवहन सेवा पोहोचत आहे. त्यामुळे तिसरी घटक संस्था म्हणून पीएमआरडीएचा समावेश करावा आणि आर्थिक भार विभागला जावा," अहवाल पुढं सुचवतो.