India

आणीबाणीची पोटनिवडणुक अशी चर्चा असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभेत पाणीबाणी

अंधेरी पूर्वच्या शांतीनगर भागात मागच्या महिनाभरापासून अधिक काळ पाणीच येत नाहीये.

Credit : Indie Journal

मुंबई । सध्या अंधेरीत जिथे महाराष्ट्राचं लक्ष लागून असलेली पोटनिवडनुक नियोजित आहे, त्याच मतदारसंघात पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे आणि इथं त्रस्त जनता अन व्यस्त नेते असं चित्र पाहायला मिळत आहे. अंधेरी पूर्वच्या शांतीनगर भागात मागच्या महिनाभरापासून अधिक काळ पाणीच येत नाहीये. इथले लोक पाण्याच्या समस्येनं हवालदिल असल्याचं चित्र आहे.

 

महिलांची ओढाताण

शांतीनगर या भागाची लोकसंख्या साधारण सहा ते साडेसहा हजार आहे. जवळ जवळ असलेली घर, अरुंद रस्ते असा हा परिसर आहे. महानगरपालिकेच्या पाण्याची पाईपलाईन आहे मात्र त्यात पाणीच येत नसल्यानं इथल्या नागरिकांना दैनंदिन वापराच्या पाण्यासाठी भटकावं लागत आहे. एकीकडे मुलांचे शाळा, घरच काम आणि त्यात पाण्यासाठी करावी लागणारी वणवण या सगळ्यामुळे इथल्या महिलांची खूपच ओढाताण होत असल्याची प्रतिक्रिया या महिलांची बोलताना दिली आहे.

इथल्या पाण्याच्या परिस्थितीबाबत शांतीनगरच्या नागरिकांशी संवाद साधला असता त्या लोकांचं म्हणणं आहे की, "आमच्याकडे जून महिन्यापासून  पाण्याच्या समस्येला  सुरवात झाली, ह्याआधी व्यवस्थित पाणी येत होतं." येथील रहिवाश्यांना आता  पाण्यासाठी वणवण करावी लागते. 

"दररोजच्या कामात अडथळा निर्माण होऊ लागला आहे. मुलांच्या परीक्षा सुरु झाल्या आहेत, आम्ही सामान्य नागरिक आहोत, चाकरी केल्याशिवाय पर्याय नाही. याआधी आम्ही पाण्याच्या वेळेत सर्व नियोजन करून पुढची पाठची कामं आवरून घ्याचो, पण आता टॅंकर येतो त्याला सुद्धा वेळ नाही. त्याचं पाणीही पुरत नाही." असंही मत स्थानिक महिलांनी मांडलं.

 

 

कोणी उपलब्धच नाही

"आम्ही स्थानिक पालिका अधिकाऱ्यांना भेटलो त्यांना आमच्या समस्या सांगितल्या तसेच लेखी पत्रव्यवहारही केला पण अजून महानगरपालिकेने हवी तशी दखल घेतली नाही."

स्थानिकांना पालिकेशी संपर्क करता यावा ह्या अनुषंगानं लोकप्रतिनिधींशीसुद्धा चर्चा केली असंही स्थनिकांचं म्हणणं आहे, मात्र तिथूनही योग्य तो प्रतिसाद आला नाही असं ते सांगतात.

"कुणालाही आमचा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही. रमेश लटके होते तेव्हा एक काळ होता आम्हाला पाण्यासाठी कधीही वणवण भटकावं लागलं नाही. मात्र, आता आम्हाला पाणी पाणी करावे लागतय." अशा प्रतिक्रिया इथल्या स्थानिक नागरिकांनी दिले आहेत.

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर आता अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आमदार रमेश लटके यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली गेली आहे. तर, त्यांच्याविरुद्ध भाजपकडून मुर्जी पटेल यांना उमेदवारी दिली जाईल अशा चर्चा आहेत. या सर्व निवडणुकीच्या रणधुमाळीत मात्र अंधेरीची जनता तहानल्याच चित्र पाहायला मिळतंय.