Quick Reads

महात्मा फुले का?

या ११ एप्रिल २०२५ रोजी महात्मा फुले यांची १९८ वी जयंती झाली.

Credit : इंडी जर्नल

 

प्रा. डॉ. दत्ताजीराव जाधव । या ११ एप्रिल २०२५ रोजी महात्मा फुले यांची १९८ वी जयंती आहे. एवढा प्रदीर्घ काळ मध्ये गेला असला तरी त्यांची आठवण काढली जाते. नवनवीन ठिकाणी, नवनवीन लोक समूूूह म. फुले यांची जयंती साजरी करीत आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर १३४ वर्षं झाली तरी म. फुले विस्मृतीत न जाता त्यांची आठवण काढणाऱ्यांची संख्या आणि अशा प्रसंगांची संख्या वाढते आहे. असे का? या गोष्टीचा परामर्श आपण काही मुद्द्यांच्या आधारे घेऊ या आणि त्यांच्या स्मृतीस अशा पध्दतीने अभिवादन करू या.

 

शिक्षणाचा प्रश्न 

ब्रिटिश सरकार शिक्षण कर घेत होते. पण शिक्षण सर्वांना दिले जात नव्हते. म. फुले यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने स्त्रिया, शूद्रादिअतिशूद्र समाजातील मुली, मुले, प्रौढ, अशा सर्वच घटकांसाठी शिक्षण मुक्त करून सुरू केले. जेवढा शिक्षण कर घेतला जाई तेवढा शिक्षणावर खर्च केला जात नसे. म्हणून म. फुले लिहितात...

 

राजे धर्मशील म्हणविती। 

आता का मागे घेती||

विद्या द्यावी पट्टी पुरती ।

धिक्कारून सांगे जोती ||

 

आत्ताही हजारो शाळा बंद केल्या आहेत. शिक्षणाची सरकारी व्यवस्था खाजगीकरणाच्या माध्यमातून मोडकळीस आणली गेली आहे. अनेक शाळांमधून शिक्षक कमी आहेत. वर्षानुवर्षे नवीन शिक्षक नेमले जात नाहीत. अशारीतीने सरकारने शिक्षणावरील खर्च आणि शिक्षणाची घटनेने दिलेली जबाबदारी कमी केली. पण शिक्षण कर कमी केला का? म्हणजे आजही पूर्ण शिक्षण कर शिक्षणावर खर्च केला जात नाही. सरकार स्वतःला धर्मशील म्हणवून घेत असले तरी सरकारच्या धोरणात या बाबतीत न्याय आहे असे स्पष्टपणे जाणवते का?

शिक्षण घेतल्यानंतर त्या व्यक्तीच्या वर्तणूकीत सकारात्मक होणारे बदल होतात का? त्याला कौशल्य प्राप्ती होते का? तो मिळवता, कुटुंबीयांचा आधार होतो का? स्वतंत्र प्रज्ञेचा चांगला नागरिक होतो का? स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, देशाचे प्रश्न सोडविण्यासाठी सक्षम होतो का? असे अनेक प्रश्न आहेत. बेकारी वाढली आहे. त्याच बरोबर शेतातील कामे, कौशल्याची कामे करायला लोक मिळत नाहीत. हे ही शिक्षण व्यवस्थेचेच प्रश्न आहेत ना?

 

म. फुलेकृत आघाडी 

म.फुलेंच्या काळात मुली, महिला यांच्यावर प्रचंड बंधने होती. त्यांचे मोठ्या प्रमाणावर शोषण होत असे. त्यांना जनावरां एवढीही किंमत नसे. महिलांना भयंकर अन्याय, अत्याचार सोसावा लागे. त्यांच्या बरोबरीने शूद्रादिअतिशूद्र यांचे ही प्रचंड शोषण होत असे. त्यांच्या वर अनेक प्रकारचे अन्याय, अत्याचार होत असत. मानहानी, मारहाण ही केली जाई. त्यांच्याशी अमानुष वर्तन केले जाई. शेतकऱ्यांची स्थितीसुध्दा अतिशय दयनीय होती. सावकार, सरकार आणि धर्म यांचा जाच यातून दु:खी कष्टी झालेला स्त्री-शूद्रादिअतिशूद्र यांचा एक गट वा राजकीय आघाडी म. फुले  सुचवितात. ती आघाडी झाली तर ती लोकशाहीत यश  मिळवू शकणार नाही काय?

 

म्हणे शिक्षणाचा भार पेलणार नाही

मुलींच्या शिक्षणाला विरोध करतांना, मुलींचे मेंदू इवले-इवले, लहान असतात, त्यांना शिक्षणाचा भार पेलणार नाही, असे म्हटले जाई. त्याच वेळी मुली, महिला या मुले,पुरूष यांच्याहून अधिक सक्षम आहेत, असे फुलेंचे म्हणणे होते. म. फुले विरोधकांचा विचार प्रवाह हा प्रगत, ज्ञानी, विद्वान आणि कर्ता म्हणून मान्यता प्राप्त होता तरी तो अज्ञानी, अंधश्रद्ध होता. हे आता महिलांनी अनेक क्षेत्रे गाजवल्या नंतर तरी मान्य करायला हवे की नको? म. फुलें यांच्या काळाच्या कसोटी वर खऱ्या, उपयुक्त, प्रगती कारक ठरलेल्या मार्गाने जायचे की नाही? का त्यांच्या विरोधकांच्या खोट्या, अंधश्रद्ध, पिळवणूक करून घेण्याच्या आणि म्हणूनच प्रगतीला मारक असलेला मार्ग सोडायला विरोध करीतच रहायचे? शहाणे, रास्त आणि न्यायी व्हायला एवढा विरोध का? म. फुलेंचे विचार कालबाह्य झालेत का? त्यांच्या विचार, कार्य यांची उपयुक्तता संपली का?  त्यांचे विचार, कार्य आजही मार्गदर्शक नाही का?ते लोकांपर्यंत जायला नको का? म. फुले ज्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी झटत होते ते प्रश्न परत आणखी गंभीर झाले आहेत. मग जाणकारांना म. फुलेंची आठवण होणारच ना?

 

शेतीचा प्रश्न

अज्ञान, अंधश्रद्धा, सुविधांचा अभाव तसेच सरकार आणि धर्म व्यवस्था यातून प्रचंड शोषण झाल्याने शेतकरी आणि शेती व्यवसाय यांची फार वाईट स्थिती झाली होती. त्या परीस्थिती चा आणि त्यावरील उपाय योजनांचा उहापोह म.फुले यांनी शेतकऱ्याचा असूड या आपल्या पुस्तकात केला आहे. त्या पुस्तकाचे सार्वजनिक वाचन बडोदा येथे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या दरबारात तसेच अन्यत्रही झाले होते. त्यावर त्या काळातील विद्वानांच्या, कर्त्या लोकांच्या चर्चा झाल्या होत्या. त्या गोष्टी तशाच मोठ्या प्रमाणावर होत गेल्या असत्या तर आत्ताच्या काळात शेतीची स्थिती काय असती?

 

 

पूर्वी कधीही नव्हती इतकी शेती अडचणीत आली आहे. कुटुंब चालवणे अशक्य होते आहे.म्हणून जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी आत्महत्या करतो आहे. शेती करणाऱ्या मुलांची लग्ने, वय उलटून गेले तरी, होत नाहीत. अनेकांना लग्नाचा विचार सोडून द्यावा लागला आहे. आपला वंश चालला पाहिजे ही सगळ्या सजीवांची नैसर्गिक प्रेरणा, भावना, अपेक्षा आणि प्रयत्न असतो. वंश खंडण व्हायचे अपार आणि नकोसे दु:ख ज्यांच्या वाट्याला आले, त्याला व्यवस्था जबाबदार नाही काय? अपघाताने वंश खंडण झाले तर कांहीं दिवस शोक करून माणसे आपले जगणे सुरू करतील. पण मुलांचे लग्नच न झाल्याने होणाऱ्या वंश खंडनाची जाणीव उरात घेऊन सामान्य लोकांनी उर्वरित आयुष्य सुखी, आनंदी आणि उत्पादक कसे करायचे? अनेक पालकांनी भयानक कष्ट करून आपल्या मुलांना शिकवले, विविध विद्याशाखांचे पदवीधर, द्विपदवीधर, अगदी संशोधन करण्याची संधी देऊन डॉक्टरेटची पदवी धारण करणारा विद्यावाचस्पती केले. अशा अनेकांना त्यांना साजेल,रुचेल, पटेल असे काम व्यवस्था देऊ शकली का? मायभूमीच्या या शिकलेल्या लेकरांचा किमान चरितार्थ तरी चालेल असे काम तरी आपण त्यांना देऊ शकतो का? देऊ शकलो का? एवढे कष्ट घेतल्या नंतर, एवढा वेळ घालवल्यानंतर, कुटुंबाच्या इतर गरजा बाजूला ठेवून, इतर कुटुंबीयांचे वाळवण, अवहेलना करून शिक्षण घेतल्यानंतर तरी त्या लेकराला उत्साह वाटेल, मनाला उभारी येईल, त्याचा मान-सन्मान वाढेल, असे काम मिळेल, असा जोडीदार भेटेल अशी परिस्थिती आहे का? त्यांच्या आयुष्यात त्यांच्या शिक्षणाचा, त्यांनी मिळविलेल्या ज्ञानाचा  समाजा पुढील, देशापुढील प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उपयोग आपण करून घेऊ शकतो का? तसे नसेल तर समाजाचे, देशाचे प्रश्न आपण कसे सोडविणार आहोत? ते प्रश्न सोडविण्यासाठी कोण येणार आहे? कुणाचा घोटाळा झाला आहे?

 

सत्यशोधन कायम आवश्यक 

इतर सर्व वस्तूंचे दर त्या त्या वस्तूंचे उत्पादक ठरवतात. मात्र शेतमालाचे दर इतर लोकच ठरवतात. निर्जीव अक्षरांचे ज्ञान असलेला पंडीत आणि दुनिया जगवण्या ची विद्या वापरणारा शेतकरी अडाणी. बळी राजाला पाताळात गाडणारी संस्कृती ती हीच. ती बदलणे गरजेचे आहे. हे स्पष्ट करून म. फुले यांनी पर्यायी संस्कृतीचा पाया घातला. सत्यशोधक समाजाची स्थापना केली. या गोष्टीला दीडशे वर्षे झाली. तरीही अजून समाज सत्यशोधक झाला नाही. अजूनही तो पोथ्या-पुराणांतील कपोलकल्पित गोष्टी खऱ्या मानूूुन वागतो आहे.त्याचा अभिमान बाळगून समाजात कलह माजवत आहे. त्या बद्दल म. फुले लिहितात...

 

असत्याचा अभिमान | तेणे पाविजे पतन || म्हणोनीया ज्ञाते जन | सत्य शोधिती ||

 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म. फुले यांचे स्वप्न काल सुसंगत पध्दतीने ते भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केले. पूर्णपणे राज्यघटनेनुसार राज्य उभे रहाण्याअगोदरच घटना नामशेष करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. घटना अडचणीत आली आहे. तिला अडचणीत आणणाऱ्यांचे उद्योग समजण्यासाठी सुध्दा म. फुले यांच्या शिकवणुकीची उजळणी झाली पाहिजे. या दोन संस्कृतींमधील संघर्ष समजून घेतला पाहिजे. सत्यशोधन ही एक कायम सुरू राहील अशी आवश्यक प्रक्रिया आहे. त्यातूनच चुकांची दुरुस्ती आणि मानवी प्रगती होत असते. म्हणून सत्यशोधक चळवळ सुरू रहाणे, प्रगत आणि प्रगल्भ होत जाणे गरजेचे आहे.

 

सहकार

सत्यशोधक चळवळीतूनच म. फुले यांच्या प्रेरणेतून त्यांच्या जवळच्या अनुयायांनी तीन सहकारी सोसायट्या स्थापन केल्या आणि महाराष्ट्रात सहकार चळवळ सुरू झाली. त्यातून साखर कारखाने, बॅंका, पाणी पुरवठा, पाणी वापर संस्था आणि इतर उद्योग सुरू झाले. शिक्षण संस्था निर्माण झाल्या.विकास झाला. सत्यशोधक चळवळीचा प्रभाव कमी झाला आणि परंपरागत सरंजामी व्यवस्थेने सहकारी संस्थांवर कब्जा केला. म. फुलेंच्या विचारांच्या विरोधकांनी  या नव्या सरंजामदारांना बदनाम करता करता सहकारच बदनाम केला. गैर व्यवस्थापन करणारे नवे सरंजामदार यांना बदलण्याऐवजी खाजगीकरण आणले गेले. लोकशाहीत लोक प्रबळ होण्या ऐवजी लोकांची गुलामगिरी कडे वाटचाल सुरू झाली. समता आणू म्हणता म्हणता विषमता वाढीस लागली. तेव्हा लोकशाही बळकट करण्यासाठी आजही म. फुले यांच्या विचारांचा आधार घ्यावा लागतो. समाजामध्ये म.फुले यांचा विचार प्रबळ असता तर पवनचक्क्या, शीतगृहे, सौर ऊर्जा प्रकल्प, शेत मालावरील विविध प्रक्रिया उद्योग सहकारातून उभे राहिले असते. ते व्यवस्थित चालले असते. शेती किफायतशीर झाली असती. सरकारची डोकेदुखी आणि समाजातील संघर्षाचे कारण ठरू पहाणारी मराठा आरक्षणाची मागणीच कदाचित पुढे आली नसती.

 

सांस्कृतिक संघर्ष

 

म. फुले हे एक संशोधक ही होते. उपलब्ध वांग्मय, चालीरीती, रूढी,परंपरा, मौखिक वांग्मय, लोककला, लोककथा अशा विविध साधनांचा तर्कशुद्ध पद्धतीने उपयोग करून त्यांनी येथील इतिहासाची मांडणी केली आहे. तेंव्हाचा काळ, उपलब्ध साधने यांचा विचार करता ही मांडणी पुष्कळच बरोबर ठरली आहे. खरे तर ही गोष्ट आश्चर्यकारक आहे. देवांचा राजा इंद्र, विविध अवतार घेतलेले भगवान विष्णू आणि  असुर म्हणून वर्णिलेले एतद्देशीय राजे, लोकनायक यांच्यामधील संघर्ष म. फुले यांनी आपल्या गुलामगिरी या पहिल्याच ग्रंथात मांडला आहे. विकासासाठी स्वातंत्र्य फारच उपयुक्त असते. मानसिक, वैचारिक गुलामगिरी भयंकर नुकसान कारक असते. गुलामगिरी हे एतद्देशीय लोकांची मानसिक, वैचारिक गुलामगिरी वर हल्ला करणारे अत्यंत गाजलेले पुस्तक.

 

मराठा आरक्षण 

स्वतःला खासा मराठा म्हणवून घेणाऱ्या माणसाशी म.फुलेंची चर्चा झाली आहे. त्यात तो खरा  कुणबी आहे. हे स्पष्ट झाले आहे. तर मृत्यू नंतर १८९ वर्षांमध्ये विस्मृतीत जाऊ घातलेल्या शिवछत्रपतींची जयंती सुरू करून फुले शिवरायांना कुळवाडी कुळ भूषण म्हणतात. म.फुलेंचे विचार समाजात वापरात असते तर मराठा समाज एवढे दिवस आरक्षणा पासून वंचित राहिला असता काय?

म. फुलेंच्या विचारांचा मागोवा घेऊनच राजर्षी शाहू महाराजांनी ब्राह्मण,प्रभू, पारशी, शेणवी वगैरे पाच जाती सोडून इतर सर्वांना आरक्षण दिले आणि ते आरक्षणाचे जनक ठरले. आपण  कुणाला आदर्श मानून त्यांचे अनुकरण करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आरक्षणाची मागणी करणाऱ्यांनी आरक्षणाच्या जनकाच्या कनवाळू, संवेदनशील, न्यायी,द्रष्ट्या मनाचा, विचारांचा,निरीक्षणांचा, केलेल्या अभ्यासाचा मागोवा घेतला आहे काय? असेल तर त्याचा संदर्भ घेतला जातो का? नसेल तर का नाही? आरक्षण हवे तर आरक्षणाच्या जनका बद्दल, आरक्षणाची कायद्यात तरतूद करणाऱ्या बद्दल कृतज्ञता बाळगावी  की नको? त्यांचा आधार, त्यांचे सहकार्य घ्यावे की नको? यशस्वी होण्यासाठी संबंधित सर्वांचा पाठिंबा, सर्वांचे सहकार्य नको का? पाठिंबा, सहकार्य हवे असेल तर.... तर त्यांच्या प्रती कृतज्ञता बाळगावी की कृतघ्णता ? त्यांचा बहुमान करावा की अवमान करावा? त्यांच्या अनुयायांशी प्रेमाने, जिव्हाळ्याने, आदराने, आपुलकीने, मित्रत्वाने, वागावे की रागाने, तिरस्काराने, द्वेषाने, अनादराने,  शत्रुत्वाने? कोणते वागणे सुख, शांती, समृद्धी, प्रगती, विकास, आनंद आणि शहाणपणाचे होईल?

 

म. फुलेंचे छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू, महाराजा सयाजीराव आणि या प्रवाहातील महा माता, संत आणि महापुरुष आपण पुरेषा प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचायला नको होते का?

 

म. फुलेंचे छत्रपती शिवराय, राजर्षी शाहू, महाराजा सयाजीराव आणि या प्रवाहातील महा माता, संत आणि महापुरुष आपण पुरेषा प्रमाणात लोकांपर्यंत पोहोचायला नको होते का? ते जर तसे पोहोचले असते तर आजचे हे प्रश्न आजच्या स्वरूपात, एवढ्या तीव्रतेने समाजापुढे, देशापुढे त्यांना गिळंकृत करायला आ वासून उभे राहिले असते काय? आपल्या देशात शिक्षणाची गंगा म. फुले यांनी सुरू केली तरी शिक्षणाच्या विषय सूची मध्ये त्यांचे विचार, त्यांची विषय सूची आपण येऊ दिली काय? ती येऊ दिली असती तर... परिस्थिती बदलली नसती काय? शेती किफायतशीर झाली असती तर काल परवा पर्यंत आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यांना सरकारचे जावई म्हणून हिणवणाऱ्यांनी ईड्ब्ल्यूएस खाली आरक्षण घेतले असते काय? मराठ्यांनी आरक्षणाची मागणी केली असती काय? आरक्षणाची मागणी केली असती, त्यांना खरेच आरक्षण हवे असते तर आमच्या लोकांनी किमान आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराजांचा तरी आधार घेतला नसता का? राजर्षी शाहू महाराजांचा आधार घेतला असता तर विश्वरत्न बाबासाहेबांचा आधार घ्यायला मागे पुढे पहायची वेळ आली असती काय? आणि एवढे महामानव पाठीशी घेतले असते तर हा प्रश्न एवढा ताणणे  शक्य आहे काय ? या महामानवांच्या आधाराने वागणे झाले तर अज्ञान, मग्रुरी, दादागिरी, अन्याय, अत्याचार आणि मग दु:ख, गैरवाजवी कष्ट, गरीबी, आणि वण वण राहील काय? मग विरोध, संघर्ष, फूट, गुन्हेगारी त्यातून देशाची एकता आणि एकात्मता यांना धोका होईलच कसा?

खरे तर एवढे मोठे शिस्तबद्ध मोर्चे, उपोषणे, बंद, आंदोलने झाल्यावर तसेच एवढे कष्ट, वेळ, पैसा आणिक राजकीय कौशल्य खर्च केल्यावर संपूर्ण भारतातील मायभूमीच्या तमाम लेकरांच्या शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि किफायतशीर शेती उद्योगाची मागणी सुध्दा सरकारला मान्य करायला लागली असती. देशातील प्रश्न आणि कलह कमी झाले असते. देशाची एकता आणि एकात्मता वाढीस लागून देशाची प्रगती कडे अगदी यानदौड सुरू झाली असती अर्थात ती अजूनही निश्चितच होऊ शकते.

 

समारोप

कोणत्याही महामानवाच्या विचार,कार्य यांना स्थल,काल यांच्या मर्यादा असतात. त्यांच्या उपयुक्ततेचा, अमरत्वाचा परामर्श एखाद्या लेखातून घेणे तसे कठीणच. पण आपण आपल्या मर्यादांलक्षात घेऊन सुध्दा हे काम करणे तसे श्रेयस्करच. त्यादृष्टीने हा अल्पसा प्रयत्न.

समाजापासून,शिक्षणाच्या गंगेतून म.फुले,त्यांचे विचार आणि त्यांची विषय सूची (अजेंडा ) दूर राहिल्याने तर हा घोटाळा झाला नाही ना? त्यांचे विचार आणि विषय सूची शिक्षणापासून अजाणतेपणी दूर राहिले की त्यासाठी कुणी जाणीव पूर्वक खास प्रयत्न केले?  हे दूर ठेऊन आपण काय मिळवले? ते शहाणपणाचे लक्षण ठरले काय? अजून किती दिवस आपण हे चालवणार आहोत आणि कशासाठी?   

या निमित्ताने म.फुले यांच्या स्मृतीस मनापासून प्रणाम करतो आणि थांबण्या पूर्वी त्यांच्या घोषणेची एकदा उजळणी करतो. सत्यमेव जयते.