India

राज्यात कोव्हिडच्या तिसऱ्या लाटेचा धोका: मुख्यमंत्र्यांनी कृती गटातील तज्ज्ञांशी केली चर्चा

देशभरात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.

Credit : File Photo

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या कृती गटातील तज्ज्ञांशी आज चर्चा केली. देशभरात आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.

राज्यात दुसऱ्या लाटेदरम्यान 'डेल्टा व्हेरिएंट'मुळे रुग्णांची संख्या पहिल्यापेक्षा खूपच जास्त आहे, त्यामुळे तिसऱ्या लाटेमध्येही रुग्णांची संख्याह जास्त असू शकते. कोरोनाच्या पहिल्या लाटेत राज्यात सुमारे १९ लाख आणि दुसऱ्या लाटेत सुमारे ४० लाख रुग्णांची नोंद झाली. तिसऱ्या लाटेत आठ लाख सक्रिय रूग्ण असू शकतात, ज्यांपैकी दहा टक्के लहान मुलंही असू शकतील, असं राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी बैठकीत सांगितलं.

यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास, डॉ रामास्वामी, डॉ संजय ओक, डॉ शशांक जोशी, डॉ राहुल पंडित, डॉ तात्याराव लहाने आदी उपस्थित होते.

गर्दी वाढली आणि नियम पाळले गेले नाहीत तर एक किंवा दोन महिन्यांत कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात येण्याची भीती टास्क फोर्सननं बुधवारी व्यक्त केली. त्याची गंभीर दखल घेत संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, आतापासूनच आवश्यकऔषधं, वैद्यकीय उपकरणांची शहरी आणि ग्रामीण भागात उपलब्धता आणि पुरेसा साठा राहील याची खबरदारी घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी झालेल्या बैठकीत महाराष्ट्रात 'डेल्टा प्लस' प्रकार कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचं कारण बनू शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.

बैठकीत आरोग्य विभागानं केलेल्या सादरीकरणात संसर्गाची नवी लाट महाराष्ट्रात येण्याची शक्यता असल्यानं त्यातील संभाव्य परिस्थितीची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. “करोनाच्या तिसऱ्या लाटेला मर्यादित कसं ठेवायचं ते आपल्या हातात आहे. आपण गर्दीची ठिकाणं टाळली पाहिजेत आणि दोन मास्कचा वापर केला पाहिजे. जर आपण या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर तिसरी लाट मोठी होईल," असं टास्क फोर्सचे सदस्य डॉ. राहुल पंडित म्हणाले.

यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लसीकरण वाढवण्याची गरज असल्याचं म्हटले. जेव्हा महामारीची पहिली लाट महाराष्ट्रात आली तेव्हा राज्यात कोणतीही मूलभूत सुविधा नव्हती, परंतु त्यानंतरच्या काळात त्यामध्ये वाढ झाली. ऑगस्ट ते सप्टेंबर पर्यंत कोविड-१९च्या लसींचे ४२ कोटी डोस देशाला मिळतील आणि त्याचा फायदा राज्यालाही होईल याकडे त्यांनी लक्ष वेधलं.

तिसऱ्या लाटेचा धोका टाळण्यासाठी राज्यभर सिरो सर्वेक्षणकरणं, मोठ्या प्रमाणावर लसीकरण करणं यावर भर देतानाच निर्बंधांचं पालन काटेकोरपणे होणं गरजेचं असल्याचं या बैठकीत सांगितलं. इंग्लडसहअन्य इतर काही देशांत पुन्हा विषाणूचा संसर्ग वाढू लागल्याने निर्बंध लावण्याची वेळ आली आहे याकडेही कृती गटाने मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं. ही संभाव्य लाट रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.