Opinion

दत्तप्रसाद दाभोळकर, नानाजी, मधु लिमये आणि बरेच काही...

मीडिया लाईन सदर

Credit : इंडी जर्नल

 

सध्या एका समारंभातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो समाजमाध्यमांत चर्चाविषय बनलेला आहे. या फोटोत देवेंद्रजींच्या शेजारी अजितदादा पवार, अशोक चव्हाण, छगन भुजबळ, सुनील तटकरे, नारायण राणे, प्रफुल्ल पटेल प्रभृती थोर विभूती बसलेल्या आहेत... ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे, गुन्हेगारीचे आणि अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे आरोप देवाभाऊंनी केले होते, तेच आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले दिसतात. राजकारणात तत्त्वनिष्ठता राहिलेली नसून, कोणता नेता कोणत्या पक्षात जाईल याची शाश्वती राहिलेली नाही!

एखाद्या राजकीय विचारामागे दृढपणे राहणारे राजकीय नेते उरले नसून, सध्या सगळे संधिसाधू बनलेले आहेत, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मध्यंतरी लोकमान्य सेवा संघ, विलेपार्ले येथे एका कार्यक्रमात बोलताना केले होते. ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते ए. बी. वर्धन यांच्यासारखे तत्त्वनिष्ठ नेते आता आसपास नाहीत. राजकीय नेते अनेकदा पक्ष बदलत असल्याने, अमुक नेते उजव्या किंवा डाव्या अथवा अन्य विचारसरणीचे आहेत, हे हल्ली फारसे कळतही नाही. विचारधारेशी एकनिष्ठ राहणारे नेते दुर्मिळ झाले आहेत. एखाद्याचे विचार पटत नसले, तरी त्यांचा आदर करण्याची वृत्ती ही फारशी राहिलेली नाही. विरोधी पक्षांशी विशेष संवाद राहिलेला नाही. असेच वर्तन सुरू राहिले, तर जनतेचा लोकशाही व्यवस्थेवरील विश्वास उडण्याची भीती आहे, असे उद्गार गडकरी यांनी तेव्हा काढले होते. त्यांचे हे मत कोणालाही पटण्यासारखेच आहे. आज महाराष्ट्रातील एकूण वातावरण पाहून, गडकरींच्या या भाषणाची आठवण झाली.. याचा अर्थ, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व देवेंद्रजी यांचे फोडाफोडीचे राजकारण गडकरींना पसंत नाही, असे दिसते. माझे कार्यक्षेत्र दिल्लीतच असून, महाराष्ट्रातील राजकारणाविषयी काहीच माहिती नसल्याचे गडकरी यांनी मिश्किलपणे तेव्हा नमूद केले होते!

 

गडकरी हे मोदी, शहा यांच्या प्रादेशिक पक्ष संपवून टाकण्याच्या प्रवृत्तीविरोधात थेटपणे उभे राहत नाहीत.

 

मात्र महाराष्ट्रात भाजपने दोन-दोन पक्ष फोडले, याबद्दल अभिनेता प्रशांत दामले यांनी एका प्रकट मुलाखतीत गडकरींना प्रश्न विचारले, तेव्हा 'तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल, ते ते पहावे' अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली... त्याचप्रमाणे राज्यातील शिवसेनेच्या युतीसंबंधी प्रश्न विचारला असता,  'आता युती कुठे आहे?' असा प्रतिप्रश्न गडकरींनी केला होता! याचा अर्थ, एकनाथ शिंदे यांचा शिवसेना हा पक्ष म्हणजे खरी शिवसेना नव्हेच, असे आपले मत असल्याचेच गडकरी यांनी सूचित केले होते.. मात्र गडकरी हे मोदी, शहा यांच्या एकूण राजकारणाच्या किंवा त्यांच्या प्रादेशिक पक्ष संपवून टाकण्याच्या प्रवृत्तीविरोधात थेटपणे उभे राहत नाहीत. सत्तेचे सर्व फायदे मिळवायचे आणि शिवाय अधूनमधून  प्रकट चिंतन करून काळजी व नाराजी व्यक्त करायची, एवढेच ते करतात.. प्रत्यक्ष कृती करण्याइतके धैर्य गडकरी यांच्यात नाही!

नवी दिल्लीच्या 'श्रीराम इन्स्टिट्यूट फॉर इंडस्ट्रियल रिसर्च' या नामांकित संशोधन संस्थेचे भूतपूर्व संचालक, देशविदेशांतील मान्यवर संस्थांचे सन्माननीय फेलो, नामवंत कबड्डी खेळाडू, भारताच्या अंटार्क्टिका मोहिमेतील सहभागी आणि एक मान्यताप्राप्त लेखक अशी ज्यांची ओळख आहे, त्या दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या लेखन आणि जीवनावर आधारित 'रंग याचा वेगळा...' हे पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले. हे पुस्तक अत्यंत वेधक आणि सुरेख आहे. या पुस्तकाची आठवण होण्याचे कारण म्हणजे, त्यामध्ये नानाजी देशमुख यांच्यावर 'आभाळाएवढा' हा एक उत्तम लेख आहे. त्यामध्ये दाभोळकर यांनी काही वेगळी निरीक्षणे नोंदवली आहेत, ती आजच्या संदर्भात महत्त्वाची ठरतात.

एकदा जनसंघाच्या एका पदाधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाल्यावर 'आता मी काय प्रायश्चित्त घ्यावं?' म्हणून त्यांनी बैठकीत विचारल्यावर, त्याला 'वरून उडी मारून जीव दे' असे सांगितलेत का, असा प्रश्नही दाभोळकरांनी नानाजींना विचारला होता! मधु लिमये आणि नानाजी देशमुख हे दोघेही विलक्षण ताकदीचे. मात्र दोघेही पूर्णपणे वेगळ्या परस्परविरोधी विचारधारा बरोबर घेऊन आजन्म कार्यरत राहिले. जनता पक्षाची यशस्वी, पण नंतर पार फसलेली खेळी दोघे बरोबरीने खेळले. उभय नेते जनता पक्षाचे प्रमुख शिल्पकार होते, असे दाभोळकर यांनी लिहिले आहे.

 

गडकरींची नानाजींशी अजिबात तुलना होऊ शकत नाही, परंतु दोघेही उदारमतवादी विचारांचे.

 

त्यानंतर अनेक वर्षांनी एकदा मधु लिमयेंच्या हातात 'हवाला' प्रकरणाचे कागद होते आणि त्यात अडवाणींपासून शरद यादवांपर्यंत सर्वांनी हवाला रॅकेटमधून प्रचंड पैसे घेतले होते, असे दिसत (पुढे अडवाणी व इतर हवालाकांडामधून सहीसलामत बाहेर पडले) होते. हवालामधून त्यांना पैसे देणारी मंडळीच, हवालामधूनच काश्मीर आणि पंजाबमधील आतंकवाद्यांना पैसे देत होती, असा आरोप होता. लिमयेंनी अस्वस्थ होऊन सरसंघचालक रज्जूभैयांपासून सर्वांना पत्र पाठवले. पण एकानेही त्यांच्या पत्राला साधी पोचसुद्धा दिली नाही! त्यानंतर लिमयेंनी नानाजींना यासंबंधी सविस्तर पत्र लिहिले आणि दाभोळकरांना ते नानाजींकडे घेऊन जाण्यास त्यांनी सांगितले. दाभोळकर आणि नानाजी यांच्यात स्नेहाचे नाते होते. मात्र त्यानंतर चार-पाच दिवसांत लिमये अचानक वारले. पुढे दाभोळकर नानाजींकडे गेले, तेव्हा त्या पत्रात काय असणार, याची मला जाणीव आहे. लिमयेंना हवालाबद्दल विचारायचे असणार. खरं सांगू, लिमये माझ्यापेक्षा खूप अधिक बुद्धिमान आणि अभ्यासू आहेत, पण व्यवहारज्ञान आणि माणसे वाचणे, यात मी त्यांच्यापेक्षा उजवा होतो. या देशातील राजकारण या मार्गाने जात आहे, हे लिमयेंना आज समजले. मात्र या देशातील राजकारण फक्त याच मार्गाने (भ्रष्टाचाराच्या) जात आहे आणि जात राहील, हे मला  १९७७ मध्येच समजले, म्हणून मी राजकारण सोडले. या मार्गाने या देशाचे काहीही भले होणार नाही. भाजपसकट सारे पक्ष, या सत्तेसाठी वखवखलेल्या टोळ्या आहेत, असे नानाजी तेव्हा म्हणाले होते.

जनता पक्ष निवडून आला होता आणि शपथ घेण्यासाठी जनसंघाचे (तो जनता पक्षात विलीन झाला होता) सारे खासदार राजघाटावर जमले होते. तेव्हा आम्ही घडवलेले, आमचे गावोगावचे निवडून आलेले कार्यकर्ते कोण 'जयप्रकाश? कोण मोरारजी'? या भाषेत बोलत होते. सत्तेची हवा माणसाला क्षणात इतकी बिघडवते हे तेव्हा लक्षात आले, असे नानाजींनी दाभोळकरांना तेव्हा सांगितले होते. नानाजींनी गोंडा प्रकल्प सुरू केला, तेव्हा त्यात फक्त रा. स्व. संघाचे स्वयंसेवक कार्यकर्ते म्हणून घ्यावेत, असा दत्तोपंत ठेंगडींचा आग्रह होता. परंतु नानाजींचा त्याला विरोध होता. कार्यकर्ते म्हणून नानाजींनी सर्व विचारधारेचे लोक स्वीकारले.

गडकरींची नानाजींशी अजिबात तुलना होऊ शकत नाही, परंतु दोघेही उदारमतवादी विचारांचे सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे, थोड्या मोकळ्या विचारांचे. नानाजींनी केंद्रीय मंत्रिमंडळातील एक महत्त्वाचे मंत्रीपद सहजपणे नाकारले. सत्ताधारी जनता पक्षाचे सरचिटणीस पद सोडले आणि ते गोंड्याला गेले. दाभोळकर यांनी 'संघ समजून घेताना' हे आणखी एक विवेचक पुस्तक लिहिले आहे, त्यामध्ये 'आजचा भारत आपला भारत' हे एक प्रकरण आहे. त्यामध्ये राणे, भुजबळ, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस. एम. कृष्णा, नारायणदत्त तिवारी, रिटा बहुगुणा ही मंडळी जनाची आणि मनाची लाज न बाळगता, कपडे बदलावे तसे पक्ष बदलतात, त्यावेळी आपण अस्वस्थ होतो, असा उल्लेख दाभोळकरांनी केला आहे. या देशात, या लोकशाहीत निवडणुकांमध्ये जात, पात, धर्म यांचे प्राबल्य आहे. पैसा आणि मनगटी ताकद वापरली जाते. प्रशासनात मोठा भ्रष्टाचार आहे. नेते मुजोर बनलेत. ते स्वतःच्या संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन करतात. भ्रष्टाचार आणि खाबुगिरी यांची चर्चा करताना, या भूभागाची प्रकृती आणि संस्कार लक्षात घेतले पाहिजेत. 'रिश्वत' आणि 'ब्राइब' याला पर्यायी शब्द संस्कृत भाषेत नाहीत. कारण 'विना द्रव्यम् न  गंतव्यम्, राजानाम् ब्राह्मणो गुरु' हे आमच्या मनात बिंबले आहे, असे लोकहितवादींनी म्हटले आहे. हा संस्कार आपल्या व्यवहारात किती भयावहपणे रुजला आहे, हे समजून घेतले पाहिजे, असे दाभोळकर आपल्या या पुस्तकात म्हणतात.

 

राजकारणातला भ्रष्टाचार हा नवीन नाही, परंतु त्याची नवनवीन रुपे समोर येत आहेत.

 

राजकारणातला भ्रष्टाचार हा नवीन नाही, परंतु त्याची नवनवीन रुपे समोर येत आहेत. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात खोके देऊन पक्ष फोडले गेले, त्याचप्रमाणे ईडीची व सीबीआयची ताकद वापरून, अन्य पक्षांतील नेत्यांना भाजपमध्ये अथवा महायुतीत अक्षरशः फरपटत आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्या विरोधातील प्रकरणे बंद करण्यात आली! काँग्रेसमधून आमदार संग्राम थोपटे यांना भाजपत आणले गेले, हे ताजे उदाहरण. 'भुजबळ तुरुंगात गेले, ते स्वातंत्र्यसैनिक म्हणून नव्हे' असे म्हणणारे फडणवीस आज, 'भुजबळ हे ओबीसी समाजाचे मोठे नेते आहेत' असा त्यांचा गौरवही करत आहेत! उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना टार्गेट करण्यासाठी फडणवीस हे नारायण राणे व त्यांच्या कुलदीपकांचा उपयोग करून घेत आहेत. 'नारायणराव, तुमची सर्व कुंडली माझ्याकडे आहे' असा दम फडणवीसांनी, तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या राणेंना भरला होता.

गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांच्या मतदारसंघात भाजपचे नेते विनोद तावडे एका हॉटेलमध्ये उतरले. तेव्हा ते पैसे वाटत असल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी ठाकूर यांनी मोठाच धमाका केला होता. ठाकुरांना तावडे यांची टीप मंत्रालयातूनच मिळाली होती. अर्थात भाजपमधील अंतर्गत संघर्षामुळे हे प्रकरण बाहेर आले. २०१९ मध्ये तावडेंचा पत्ता फडणवीसांनीच कापला होता. त्यांना विधानसभेचे तिकीटच दिले नव्हते!असो. दुसरे एक प्रकरण धुळ्यामध्ये घडले. शिंदेसेनेचे अर्जुन खोतकर यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळाच्या अंदाज समितीचा दौरा असताना, खोतकरांच्या सचिवाच्या खोलीत एक कोटी रुपयांहून अधिक नगद सापडली. भाजपने सोबत घेतलेल्या दोन पक्षांसह महाराष्ट्रात कोणत्या प्रकारची राजकीय संस्कृती रुजवण्याचे व्रत हाती घेतले आहे, याची यावरून कल्पना सहज येऊ शकते! एकूण, नानाजींच्या वेळचा जनसंघ खूपच बरा होता, असे म्हणण्याची वेळ आली आहे! आज नानाजी हयात असते, तर कदाचित भाजप व त्याच्या मित्र पक्षांचे प्रताप पाहून, स्वतःच वरून खाली उडी टाकली असती...