India
लवकर आलेल्या मान्सूनमुळं राज्यात उन्हाळी पिकांची वाताहत
पावसामुळं साधारणतः ६४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित.

आकाश लोणकर । यंदा महाराष्ट्रात मान्सूननं १० दिवस आधीच हजेरी लावल्यामुळं मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रासह राज्यातील विविध भागात शेती क्षेत्रातील उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावरच शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत आला आहे. नुकसान भरपाई म्हणून शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले, तरी अजून शेतकऱ्यांपर्यंत कोणत्याही प्रकारची मदत पोहोचली नाही.
महाराष्ट्र कृषि विभागानं दिलेल्या माहितीनुसार मे महिन्यात आलेल्या या पावसामुळं साधारणतः ६४ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची लागवड केली होती. मात्र, लवकर आलेल्या मान्सूनमुळे कांदा, ज्वारी, मूग, हरभरा, तीळ, अशा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रात गुरांना वर्षभर पुरवला जाणारा चारा पावसामुळं जमा करण्याअगोदरच खराब झाला आहे.
अनिश्चित आणि लवकर आलेल्या मान्सूनमुळे खरीप हंगामातील पेरणीचे वेळापत्रक विस्कळीत झालं असून मातीत वाढलेल्या जास्त ओलाव्यामुळे सोयाबीन, कापूस व भात यांसारख्या महत्त्वाच्या पिकांची पेरणी पुढे ढकलावी लागत आहे.
उन्हाळी पिकांचं नुकसान
बीड जिल्ह्यातील मन्यारवाडी गावचे शेतकरी मारोती शिंदे यांनी त्यांच्या शेतात कांद्याचं उत्पादन घेतलं होतं, मात्र नुकत्याच झालेल्या पावसानं संपूर्ण पिकाचं नुकसान झाल्याचं त्यांनी सांगितलं.
“मी अर्धा एकर कांद्याचं पीक लावलं होतं. पण पाऊस लवकर आल्यानं ते पूर्णपणे खराब झालं आहे. जवळपास ५० पोती कांदे झाले होते, परंतु त्यातल्या ४० – ४५ गोणी आम्हाला फेकून द्याव्या लागल्या. त्यातून जे विकले गेले त्याला फक्त ६ ते ७ रुपये प्रति किलो भाव मिळाला. मागील बरेच दिवस सलग झालेल्या पावसामुळे शेताची अजून नांगरणी अपूर्ण आहे, शेत दुरुस्त करायचंय, पण शेतातलं पाणी मुरत नाही, त्यामुळं दुरुस्ती ताटकळली आहे. पंचनामा करण्यासाठी तलाठी गावात येत नाही आणि पंचनाम्यासाठी काय कराव लागतं, याची आम्हाला काहीच माहिती नाही,” शिंदे सांगतात.
स्थानिक तलाठी करनकुमार बनसोडे यांना यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले, "आम्ही याबद्दल पंचनामे सुरू केले आहेत, कृषि विभाग आणि महसूल विभाग सादर केलेल्या अहवालाची पाहणी करून जर नुकसान ३३ टक्क्यांहून अधिक असेल तर त्या शेतकऱ्याला भरपाई देण्यात येईल. मन्यारवाडी गावातील शेतकाऱ्यांसाबधी बोलताना बनसोडे यांनी “अजून पाहणी सुरू आहे, शेतकऱ्यांनी तक्रार करावी आणि पंचनामे करून घ्यावेत” असं सांगितलं.
अमरावती जिल्ह्यातील शेतकरी देविदास राऊत म्हणतात “माझ्याकडे अडीच एकर जमीन आहे, आम्ही सोयाबीन हे मुख्य पीक घेतो. या पावसात शेतात लावलेल्या तिळाच संपूर्ण नुकसान झालेला आहे. मागील वर्षाचं सोयाबीन योग्य भाव न मिळाल्यामुळे अजून घरात पडून आहे.त्यामुळे सरकारकडून आता कोणत्याही प्रकारची अपेक्षा राहिली नाही, यातच पुन्हा खत, बी-बियाणांचे भाव वाढल्यानं आता जमिनीची कशी मशागत आणि पुढची पेरणी कशी करावी, हा प्रश्न आमच्यापुढे उभा आहे.”
विदर्भातील शेतकऱ्यांची परिस्थिती अजूनच गंभीर असल्याचं स्थानिक शेतकरी नेते श्याम शिंदे सांगतात. ते म्हणाले, "मागील महिन्यात एकट्या विदर्भात ६८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. एकीकडे कर्जमाफी आणि हमीभाव देऊ म्हणून सरकार आश्वासन देत आहे मात्र त्याची अंमलबजावणी कुठेही होताना दिसत नाही.”
पारंपरिक पीक घेतलं तर भाव नाही अन् फळबाग पालेभाज्या, तरकारी केली तर अवकाळीचं संकट.. एकीकडं अस्मानी संकट जगू देत नाही तर सरकारला शेतकऱ्यांचं काही देणंघेणं उरलं नाही. सोयाबीन-कापसाच्या भावाबाबतचा अंधार बघून टोमॅटोसारख्या पिकात आशेचा किरण शोधणारा शेतकरी आज अवकाळीने कोलमडून पडलाय.… pic.twitter.com/nSpxSAcFO1
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 3, 2025
श्याम शिंदे पुढे म्हणाले, "विदर्भातलं प्रमुख पीक असलेल्या सोयाबीनला मागील वर्षी अत्यल्प भाव देऊन सरकारनं शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत टाकले आहे. पेरणी अगदी तोंडावर येऊन थांबली आहे, मात्र मागील पिकांना योग्य हमीभाव मिळाला नसल्यामुळे गेलात वर्षीच अर्धं सोयाबीनचं उत्पादन अजून घरातच पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसेच नाहीत. त्यामुळे विदर्भातील शेतकरी सावकाराकडून कर्ज काढून पुन्हा आर्थिक अडचणींना सामोरे जात आहेत. आमच्या नांदगाव तालुक्यात १० वर्षाखाली किमान २-३ एकर शेती असणारे शेतकरी आता भूमिहीन झाले आहेत. कर्जबाजारीपना आणि शेती न परवडल्याने शहरात गवंडी काम किंवा हमाली करण्याकडे शेतकरी वळत आहे."
सरकारच्या हालचाली अजून अपूर्णच
कृषि विभागातील जिल्हाधिकारी उपसंचालक आयुक्त राजेंद्र पाटील यांना याबाबत विचारलं असता त्यांनी सांगितलं, "पंचनाम्याचे आदेश गेलेले आहेत, मात्र अजून त्याचा अहवाल आमच्यापर्यंत आलेला नाही. पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच, नुकसान ३३ टक्क्यांपेक्षा अधिक असेल, तर त्या शेतकऱ्यांना भरपाई मिळेल. आमच्याकडे आलेल्या प्राथमिक माहितीनुसार साधारण ६४ हजार हेक्टर क्षेत्र मे महिन्यात बाधित झालं आहे."
रोहा तालुक्यात पावसाचा कहर!
— Mahaenews (@mahae_news) May 29, 2025
गेल्या ३-४ दिवसांच्या मुसळधार पावसामुळे तिसे, चिंचवली, कोलाड, वरसगाव, गोवे आदी गावांतील भात शेती जलमय.
उन्हाळी हंगामातील उभ्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान; शेतकऱ्यांवर संकट.#Roha #Raigad pic.twitter.com/GK23ZD4fla
पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या परिस्थितिविषयी बोलताना किसान सभेचे नेते अमोल वाघमारे सांगतात, "पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी उन्हाळ्यात प्रामुख्यानं फळं, भाजीपाला यांची लागवड करतात. मे महिन्यात झालेल्या पावसामुळे भाजीपाल्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याचबरोबर गुरांच्या चाऱ्याचंदेखील नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांपुढे पुढील एका वर्षाच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहिला आहे. आदिवासी भागातील शेतकऱ्याचे हिरडा पिकाचंदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे."
“शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, पाऊस खरीप महिन्यात काही दिवस खंडित असेल,” असं आवाहन हवामान अभ्यासकांनी केलं असलं, तरी खरीप शेतीचं वेळापत्रक विस्कळीत होत असल्यामुळं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमध्ये पेरणीसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.