India

महाराष्ट्रात ब्रेक दि चेनच्या आदेशात सुधारणा, या नवीन सेवा आवश्यक सेवांमध्ये

आणखी काही सेवांचा समावेश आज (दि. ५ एप्रिल) राज्य सरकारनं आवश्यक सेवांमध्ये केला आहे

Credit : DNA India (Representational image)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार दिवसागणिक आदेशात बदल करत आहे. ४ एप्रिलला प्रसिद्ध केलेल्या ब्रेक दि चेनच्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश आज (दि. ५ एप्रिल) राज्य सरकारनं  केला आहे.

 

या सेवांचा आवश्यक सेवांमध्ये समावेश

पेट्रोल पंप आणि पेट्रोलियम संबंधित उत्पादनं, सर्व प्रकारच्या कार्गो सेवा, डेटा सेंटर, क्लाऊड सर्व्हिस प्रोव्हायडर्स, आयटी - माहिती तंत्रज्ञान सबंधित महत्वाच्या पायाभूत सुविधा आणि सेवा शासकीय व खासगी सुरक्षा सेवा व फळविक्रेते इ. सेवा या आवश्यक सेवेमध्ये येतील. 

 

खाजगी आस्थापनातील कर्मचाऱ्यांना लसीकरण आवश्यक 

काही खासगी आस्थापना व कार्यालयं सकाळी ७ ते रात्रो ८ या कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. मात्र केंद्र शासनाच्या निर्देशानुसार त्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण करावं लागेल. जोपर्यंत होत नाही तोपर्यंत दर १५ दिवसांचे कोरोना निगेटिव्ह आरटीपीसीआर प्रमाणपत्र बाळगावे लागेल. 10 एप्रिलपासून याची अंमलबजावणी केली जाईल आणि नियम तोडणार्या व्यक्तीकडून १ हजार रुपये दंड घेण्यात येईल.

 

ही खासगी आस्थापने व कार्यालये असतील सुरू

सेबी तसंच सेबी मान्यताप्राप्त संस्था जसं की स्टॉक मार्केट, डिपॉझिट आणि क्लिअरिंग कॉर्पोरेशन्स, रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालील संस्था, प्राथमिक डीलर्स, सीसीआयएल, एनपीसीआय, पेमेंट सिस्टीम ऑपरेटर्स, सर्व नॉन बँकिंग वित्तीय महामंडळं, सर्व मायक्रो फायनान्स संस्था, सर्व वकिलांची कार्यालयं, कस्टम हाऊस एजंट्स, परवानाधारक मल्टी मोडल ट्रान्सपोर्ट ऑपरेटर (लस/ औषधी / जीवनरक्षक औषधांशी संबंधित वाहतूक). 

 

प्रवाशी, कामगारांना ओळखपत्र आवश्यक

ज्या व्यक्ती रात्री ८ ते सकाळी ७ या वेळेत रेल्वे, बसेस, विमाने यातून आगमन किंवा प्रस्थान करणार असतील त्यांना अधिकृत तिकिट बाळगावं लागेल जेणे करून ते संचारबंदीच्या कालावधीत स्थानकांपर्यंत किंवा घरी प्रवास करू शकतील.औद्योगिक कामगारांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे रात्री ८ तर सकाळी ७ या वेळेत कामाच्या पाळ्यांनुसार ये जा करता येईल. परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना रात्री ८ नंतर घरी प्रवास करावयाचा असेल तर हॉल तिकीट बाळगावं लागेल.

 

लग्न, धार्मिक कार्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक 

एखाद्या धार्मिक स्थळी विवाह किंवा अंत्यसंस्कार असेल तर शासनानं ४ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशातील नियमांचं पालन करून परवानगी देता येऊ शकेल. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवार आणि रविवारी विवाह समारंभ असेल तर स्थानिक प्रशासन त्यासंदर्भात परिस्थिती पाहून आणि नियमांचं पालन करण्याच्या अटींवर  परवानगी देईल. घरगुती काम करणारे कामगार, वाहनचालक, स्वयंपाकी यांच्या रात्री ८ नंतर ये जा करण्याच्या बाबतीत स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण परिस्थितीनुरूप निर्णय घेईल.