India

अखेर नयनतारा सहगल महाराष्ट्रात

मुंबईतील कार्यक्रमात सहगल यांना ऐकण्याची रसिकांना संधी

Credit : Scroll.in

मराठी साहित्य आणि कलाविश्वातील लेखक-कलावंत आणि रसिक यांनी एकत्र येऊन २९ जानेवारीला सायंकाळी शिवाजी मंदिर, दादर इथँ ‘चला एकत्र येऊ या!’ या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीत अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर चर्चा करणारा हा मेळावा पार पडणार आहे.

यवतमाळमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाचं निमंत्रण ज्येष्ठ भारतीय लेखिका नयनतारा सहगल यांना दिलं गेलं होतं. मात्र संमेलनाच्या आयोजकांनी ते निमंत्रण ऐनवेळी रद्द केलं. या घटनेचा निषेध अनेक पातळ्यांवर आणि खुद्द संमेलनातही विविध प्रकारे झाला. अनेकांनी संमेलनावर बहिष्कार टाकला तर अनेकांनी संमेलनस्थळी जाऊन या कृतीला आपला विरोध दर्शवला. परंतु या घटनेमुळे, मराठी माणसांनीच एका ज्येष्ठ साहित्यिकाला अवमानित केल्याचा संदेश सर्वत्र गेला. या लज्जास्पद घटनेबद्दल नयनतारा सहगल यांची माफी मागून मराठी साहित्यिक - रसिकांकडून त्यांचं स्वागत करावं व त्यांच्याशी संवाद व्हावा, या उद्देशाने मराठी लेखक, कलावंत, वाचक आणि रसिक यांनी २९ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता मुंबईमध्ये, दादरमधील शिवाजी मंदिरमध्ये इथं  नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीत कार्यक्रम आयोजित केला आहे.

अमोल पालेकर, येशू पाटील, अरुण खोपकर, जयंत पवार यांसह आणखी काही मान्यवर साहित्यिक, विचारवंतांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे.

“हा कार्यक्रम म्हणजे सर्व साहित्य आणि कलाप्रेमी मराठी भाषिकांचा मेळावा आहे. त्याच्या आयोजनामागे कोणीही राजकीय व्यक्ती, पक्ष वा संघटना नाही. या कार्यक्रमाला कोणी उद्घाटक वा प्रमुख अतिथी असणार नाहीत. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून पाठिंबा असलेला साहित्य आणि कला प्रेमी मराठी भाषिकांचा हा उत्स्फूर्त मेळावा आहे.” असं शब्द पब्लिकेशनचे येशू पाटील यांनी सांगितलं.

या कार्यक्रमाला नयनतारा सहगल यांच्या बरोबर भालचंद्र नेमाडे, पुष्पा भावे, डॉ गणेश देवी, हरिश्चन्द्र थोरात, अरुण खोपकर, सुनील शानभाग, चंद्रकांत कुलकर्णी, राजीव नाईक, येशू पाटील, टी.एम. कृष्णा, सिद्धार्थ वरदराजन, प्रज्ञा दया पवार, जयंत पवार, ज्ञानेश महाराव, संध्या नरे पवार, समीना दलवाई, अनंत भावे, अमोल पालेकर, अतुल पेठे, किशोर कदम, इंद्रजीत खांबे, डॉ विवेक कोरडे, गणेश विसपुते, संजीव खांडेकर, सुबोध मोरे, आशुतोष शिर्के, अविनाश कदम, इत्यादी मान्यवर लेखक, कवी, कलावंत, विचारवंत उपस्थित असतील. कार्यक्रम मराठी साहित्य रसिकांसाठी खुला आहे.